postbox media

Saturday 15 August 2020

शिवडी - न्हावा सी लिंक

शिवडी - न्हावा सी लिंक आणि न्हावाचे प्रश्न आणि विकास

भारतातील महत्त्वाकांक्षी ट्रान्स हार्बर लिंक या  सर्वात मोठ्या लांबीच्या पुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच पहिल्या गाळ्याच्या उभारणीचे  उद्घाटन केले, मुंबई पारबंदर प्रकल्प / मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प किंवा शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रस्तावित प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाईल. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाईल ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक सुलभ होईल. तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता यावे यासाठी शिवडी न्हावा सी लिंक आणि त्याबरोबर वरळी ते शिवडी असा उन्नत मार्ग याच प्रकल्पातंर्गत हाती घेण्यात आला आहे. शिवडी,वरळी  हे मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीत असल्याने तिथल्या स्थानिक प्रश्नांना योग्य पद्धतीने सोडविण्यात आले असल्यामुळे मुंबई सोबत नवी मुंबई आणि विमानतळ परिसराचा विकास झपाट्याने व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत.
    दुसऱ्या बाजूला शिवडीमधून जाणारा हा सी लिंक नवी मुंबईच्या ज्या भागात उतरत आहे, तेथे सिडकोच्या माध्यमातून रस्ते, रेल्वे, नागरिक संकुल आणि वाढते नागरीकरण या भागात मोठ्या प्रमाणावर होत आहे. मूळ रहिवाशी भाग असलेल्या शिवाजी नगर, न्हावा खाडी, मधला पाडा, न्हावा गाव, उलवे , कोपर, मोरावे, बामणडोंगरी इथल्या स्थानिक आणि प्रकल्पग्रस्ताच्या समस्या सोडविण्याचा वेग सरकारला वाढवावा लागणार आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्ताच्या रोजगाराच्या प्रश्नांसोबत, आगरी कोळी बांधवांच्या सागरी, मासेमारीच्या, जगण्यासाठी  पिण्याच्या पाण्याची समस्या इथल्या स्थानिक रहिवाश्याना मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. गाव देवी जत्रेसाठी  प्रसिद्ध असलेल्या " न्हावा " गावच्या समस्या ऐकल्यावर समुद्राजवळचा दुष्काळी भाग असल्यासारखे वाटते. कधी कधी महिना महिना या गावात पाण्याचा पुरवठा होत नाही, रहिवाशी अनेक वेळा मैलो मैलो पायपीट करून पाण्यासाठी वणवण करत असतात. स्थानिक लोकसेवक, नगरसेवक आणि समाज प्रतिनिधी या प्रश्नांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करतात आणि प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असतात.पण कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा असे न्हावातील रहिवाश्यांचे सार्वत्रिक मागणे आहे. स्थानिक समाजसेवक रवीशेठ पाटील या भागातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी आणि समाजोपयोगी काम करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात.

मुंबईला रायगड जिल्ह्यासोबत जोडणाऱ्या सागरी मार्गाची संकल्पना सर्वप्रथम १९६३ साली रचली गेली होती. राजकीय रस्सीखेचीमुळे हा प्रकल्प सुरुवातीला बासनातच राहिला. २०१२ साली काँग्रेस सरकारच्या काळात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाना हिरवा कंदील दिला गेला, त्यावेळी  केंद्रीय पर्यावरण  मंत्रालयाने ह्या प्रकल्पास मंजूरी दिली. परंतु ह्या पूलामुळे येथील नैसर्गिक खारफुटी नष्ट होण्याची भिती पर्यावरणवाद्यांकडून  केली जात होती, पण वनीकरणाच्या उपाययोजनांमुळे हा प्रश्न सुद्धा निकालात निघाला. मुंबई ते नवी मुंबई, जेएनपीटी, मुंबई-गोवा महामार्ग तसेच रायगड जिल्ह्यातून दक्षिणेकडे जलदगतीने जाण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात जोमाने सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचे फायदे २२ किमीचा सागरी मार्ग, एकूण सहा मार्गिका, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणी, नवी मुंबई विमानतळाला जोडणी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला जोडणी, रेवस बंदराला जोडणी, मुंबई-पनवेल अंतर १५ किमी.ने कमी होईल, नवी मुंबई, द्रोणागिरी, उलवे आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाला हातभार,१३० हेक्टरवर उभारणार प्रकल्प, ८८ हेक्टर जागा सिडकोची, तर २७.२ हेक्टर मुंबई पोर्ट ट्रस्टची, उर्वरित जागा खासगी मालकीची असणार आहे. मुंबईच्या दक्षिण भागातील शिवडीपासून न्हावा शेवापर्यंत जाणाऱ्या २२ कि.मी. लांबीच्या या पुलामुळे मुंबई, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रवासाच्या वेळेत लक्षणीय कपात होणार आहे. सध्या मुंबईतून रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी कमाल अडीच तास लागतात. ट्रान्स हार्बर लिंकमुळे केवळ तासाभरात हे अंतर कापता येईल.
शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (एमटीएचएल)  ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली झाल्यावर या मार्गिकेवर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावू शकतील, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (एमएमआरडीए) सांगण्यात आले आहे. यामुळे मुंबईतून नवी मुंबईमध्ये थेट २० ते २५ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर आर्थिक निर्बंध आणि आणीबाणी बरोबर आर्थिक आणि कामगार कपात सारखे प्रश्न अशा महत्वाकांक्षी प्रकल्पाला अडसर नको निर्माण व्हावेत. कारण  इथल्या स्थानिक लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक , सामाजिक प्रगती यासाठी असे प्रकल्प अत्यावश्यक आहेत.

लेखक
वैभव जगताप
www.postboxindia.com

माळरानावरचे दगडफूल आणि " आंबेडकर

माळरानावरचे दगडफूल आणि " आंबेडकर  "

भारतीय समाज चातुर्वण्यधिष्टीत असून तो अनेक जाती पोटजाती मध्ये विभागला गेला आहे, एक जात दुसऱ्या जाती धर्मापेक्षा श्रेष्ठ समजत असल्यामुळे  जातीय विषमता ही सामाजिक न्याय निर्माण करनाऱ्या  समाजाला छेद देत असते. 

भारतात हजारो वर्षांपासून गावगाड्याबाहेर भटक्या जाती जमातींचे वेगळे विश्व आहे ते मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित आहे, या जाती उपजीविकेसाठी सतत कुटुंबासह भटकंती करत असतात यांच्याकडे स्वतः:चे गाव, घर, शेती नाही. गावगाड्याबाहेर निमित्तमात्र उपयोगी व्यवसाय करून हा समाज आपली उपजीविका करतो. या समाजाला गावगाड्याचा कोणताही दर्जा नाही किंवा त्यांना गावगाड्यात सामावून घेण्यात आले नाही. यांचे संस्कार, बोली , विधी , वेशभूषा, राहणीमान, स्वतंत्र आणि इतरांपेक्षा भिन्न आहे. कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात या समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात अनेकदा अभे राहावे लागते. पारंपारिक रूढी, प्रथा, परंपरेतून हा समाज बाहेर आला नाही. बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय संकल्पनेला योग्य रीतीने अंमलात आणण्यासाठी याच समाजातील तरुण पिढीला पुढे यावे लागणार आहे. 

सिदगोंडा आण्णासो पाटील, सांगली खानापूर तालुक्यातील विटा शहर गावाजवळच्या अतिदुर्गम खेड्यातून पायपीट करत उदर निर्वाह करणा-या ‘भटक्या’ आणि ‘विमुक्त’ जातींचे प्रतीनिधीत्व करणारा चेहरा. बेळगाव, कागल, निपाणी या उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र याला जोडणाऱ्या सीमाभागातील या भटक्या विमुक्तांची कैफियत आजही तशीच आहे. आयुष्य सुंदर आहे तर मग त्याला पाहिले की संपूर्ण भटक्या - विमुक्त यांच्यासाठी हे एकच गाणे का सुचावे " आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?...जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?...कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !

देश बदलतोय, राजकारणाचे समाजकारणाचे रंग बदलतायत, पण या ओळी मात्र आजही महाराष्ट्राची भळभळती जखम आहे तशीच आहे. ऊसतोड कामगार, मेंढपाळ, रस्ते,पाट बंधारे निर्मिती कामगार, हंगामी शेती कामगार यांच्या प्रश्नांवर सरकारी दफ्तरी नोंद आहे पण सर्वच प्रश्नांची उत्तरे मात्र व्यवस्थेकडे नाहीत. सिदगोंडा दारो-दारी फिरून महिलांच्या केशशृंगाराच्या, लहान मुला मुलींच्या वेणी फणीच्या गृहपयोगी वस्तु विकायचा, अंगावर पांढरी फाटकी पैरन आणी खाकी चड्डी अंगावर असायची. कडेगावच्या बाजारपेठेत जाण्यासाठी वाटेत कोतीज या गाव खेड्यातून त्याचे जाणे येणे नित्याचे होते, सिदगोंडा आणी त्याची घरची परिस्थीती फार नाज़ुक होती. दुष्काळी भाग त्यात पाण्याची, रोज़गाराची समस्या आ वासून उभी असल्यामुळे सर्वांच्याच पायाला भींगरी लागलेली. उदरनिर्वाहासाठी फिरस्ती झालेला सिदगोंडा घरोघरी जाऊन, स्त्रियांनी वेणी फणी करत साठवून ठेवलेल्या केसांच्या पुंजक्यांच्या मोबदल्यात त्या त्या स्त्रियांना पिना, चाफ, गोंडा, रिबीन, टिकल्या आणि इतर साज व केशशृंगारीक वस्तू द्यायचा. अर्थात हे काम केसावळ आणि इतर केश शृंगारीक, गंगावण, तत्सम कृत्रिम केशनिर्मिती वस्तू तयार करणाऱ्या लघु उद्योजक कंत्राटदाराकडून या पोरांना मिळत असे. हे सर्व जमा करताना, फिरताना पंधरा ते वीस गावे पायी विना चप्पल तुडवून झाली की घराकडे परतीच्या प्रवासाला निघायचे. वाटेत जे जे मिळेल ते ते खाणे आणि पोटापाण्यासाठी फिरणे. मध्येच ऊस, आंबे-करवंदे खाऊन पोट भरणे, तर कधी कोणाच्या शेतातून हरभरा काढून खाणे, कोणी भाकर चटनीचा तुकडा दिला तर खुशीने घेणे, बोरवेल किंवा रस्त्यालगतच्या विहीरीतून पाणी काढून पिणे असे रोज चालत असे. कधी कधी तर मोकाट कुत्री गावात भुंकत मागे लागत मग अशा वेळी हातात दगड घेवून फिरावे लागते, काय करणार ?  त्या दिवशी सिदगोंडा ला मी कुतूहलापोटी बोलते केले, भटक्या आणि विमुक्त जातींच्या समाजातील लोकांची, त्यांच्या अनेक प्रश्नांची स्वातंत्र्यानंतरही उत्तरे ना त्या ‘समाजाला’ मिळालीत ना आज पर्यंतच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेला. हाताच्या बोटावर मोजण्याचे अपवाद सोडले तर या समाजातल्या चाळीशीतल्या तरूणाला कागदपत्रांवर ‘मी अंगठा लावतो’ असे ऐकताना पाहिले की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र नक्की हाच का ?
आपण भारतीय आज ‘मंगळावर’ पोहोचलो पण विटा, सांगली, ‘बेळगाव’ आणि सिमाभागातील लोकांच्या मुलभूत प्रश्नांपर्यंत पोहोचणे इथल्या व्यवस्थेला अजूनही शक्य होत नाही. सॅण्डविच झाल्यासारखी अवस्था झालेल्या या पिढीतल्या मुलांची जी दुर्दशा आज आहे ती मोठे प्रश्न घेऊन भविष्यात उभे ठाकू शकते. सिदगोंडाशी गप्पा झाल्या, धरणाच्या पाटावरचे काम सध्या थंड म्हणून इतकी पायपीट करून पोट भरायला फिरावे लागते, शाळेत जातो, अभ्यासाची प्रचंड आवड, कामामुळे एका गावात शाळा सातत्य ठेवता येत नाही, तीन चार शाळा बदलाव्या लागल्या परिणाम अभ्यास आणि एकाग्रतेवर होतो, आई वडील अशिक्षित त्यामुळे घरातून शिक्षणाला तितकासा पाठींबा पण नाही. तरी जिद्देने शिक्षण घेतोय.
       औषधी गुणधर्म असल्यामुळे माळरानावर उगवलेल्या दगडफूलाचा पाला जखमेवर चोळला की जखम लवकर बरी होते, यावेळी दगडफुलासारखी निरागसता सिदगोंडाच्या नजरेत होती. आजू बाजूच्या चार घरातून काहीच न मिळाल्यामुळे तो निघून गेला. त्याच्या पाठमो-या आकृतीकडे मी नुसताच पाहत होतो, धुळीत पाय माखले होते, आता तो माळरानापर्यंत पोहोचला होता. आज शाहू,फुले,आंबेडकर यांच्या जयंत्या मोठ्या दिमाखात साजऱ्या होतात त्यामागे सामाजिक न्याय, समता, बंधुत्व  या पेक्षा राजकीय मतांची गोळाबेरीज जास्त दिसते. या समाजात बाबासाहेबांची शिकवणुक कृतीत असल्यामुळेच की काय इतर समाजांविरुद्ध  ईष्येपोटी रस्त्यांवर मिरवणुका नसतात, मोठे ढोलताशे नसतात, डीजे नसतो, नाच गाणे व्दिअर्थी गाणी नसतात, इतर समाजाना कमी लेखण्यासाठी  रंगाच्या, झेंड्यांच्या उधळणीचा अहंकारी बडेजाव नसतो.
सिदगोंडाच्या झोपडीत आंबेडकर जयंती मोठ्या दिमाखात साजरी होते, बाबासाहेबांच्या तसवीरीसमोर एक दिवा लागतो, मेहनतीच्या स्वाभिमानाच्या पैशातून. शिक्षण आणि समाज शिक्षण यातून दिवा लागला की घराघरातून निर्माण होणाऱ्या मंद प्रकाशातून संपूर्ण समाजाला ऊर्जा मिळते एक नवा अध्याय निर्माण करण्याची.

असा अध्याय निर्माण व्हावा, हीच ऊर्जा कायम टिकावी, प्रोत्साहन मिळावे म्हणून पूर्वीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार आता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जात आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांनी त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार, १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

वैभव जगताप
लेखक
www.postboxindia.com

एका तळ्यात होती


एका तळ्यात होती

श्युर स्वीटहार्ट, संध्याकाळी लवकर येतो, मंगतराम पेट्रोलपंप च्या बाजूला गजानन वडापाव आहे बघ तिथे तू थांब, मी तुला तिथूनच पिकअप करतो, मस्त तिथूनच डिनर ला जाऊया. असे बोलत राहुलने लॅपटॉप वर कसलेसे टुकटुक केले आणि खाली बघत पुन्हा मोबाईल फोन वर वैष्णवी ला म्हणाला, आई आणि विनय ला पण सोबत घेणार आहेस का? 
" नाही रे, पलीकडून वैताग वाला आवाज. कानावरचा फोन तसाच ठेवत वैष्णवी ने दुसऱ्या हातातला रिमोट आपटला. आणि विनय आणि आई ला न घेता बाहेर जायचा बेत फायनल झाला. संध्याकाळी राहुल ने गजाननच्या इथून वैष्णवीला पिक अप केले, तिथून डिनर साठी आस्वाद ला जायचे होते, आई आणि विनय घरी होते आणि त्यातून डिनर ला जायला नेहमी सारखाच उशीर झाला होता, त्यात कुठची अवदसा घडावी घाई गडबडीत राहुल ने पुढचा सिग्नल तोडाला, त्याच्या हि गोष्ट लक्षात होती पण टाईमिंग या वेळी मात्र त्याचे  चुकले होते. तिथेच जवळच ड्युटीवर उभ्या असलेल्या ट्राफिक पोलिसाने त्याची गाडी अडविली. त्यानंतर वादावादी आणि पुन्हा पावती फाडण्याचा योग राहुल ला आला. ट्रॅफिक पोलीस कसे हफ्ते घेतात, कायदा शिकवू नका मला, तुमच्या पेक्षा जास्त समजतो मला आणि तुम्ही  ड्युटी कशी निट बजावत नाहीत, झोपा काढता म्हणून अपघाताचे प्रमाण कसे वाढले आहे, आपली काहीच चुक न्हवती, आपण कसे चुकीचे नाही, सर्व यंत्रणा, खड्डे, टोल वसुली ते मंत्री कसे पैसे खातात याचे डोस प्रामाणिक ट्राफिक पोलिसाला देऊ लागला, खरा राग तर  पावती फाडल्याचा होता. चांगल्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन राहुल एमबीए इन बिझनेस मॅनेजमेंट झाला होता. लग्नानंतर राहुल आई, सोळा वर्षाच्या विनय त्याचा मुलगा आणि धर्मपत्नी वैष्णवी यांसोबत स्टँडर्ड लाईफ जगत होता. एमएनसी कंपनी, लॅव्हिश लाईफ स्टाईल, हाय फाय टॉवर वाली सोसायटी यामध्ये ड्युप्लेक्स फ्लॅट. बाकी प्लॉट, शेअर मार्केट, आणि इतर गुंतवणूक बऱ्याच, एका यशस्वी शिक्षित नोकरदारांच्या कमीत कमी गरजा, अपेक्षा काय म्हणून एखादी गाडी असावी अशी एक पॉश कार हि आता दारात होती.
मला या देशाच्या सिस्टम चा प्रचंड राग येतोय. काहीही नियंत्रण नाही, जो तो आपापल्या मर्जीने वागतोय.. बघितलंस कसा माजोरडा होता तो पोलीस वाला, लायकी आहे का त्याची..सरकारी नोकऱ्या वशिल्याने मिळवलेले हे.. तुला सांगतो वैष्णवी या देशाचे काही होणार नाही...          " जावू दे रे.. राहुल.. किती त्रागा करतोयस इति वैष्णवी..  वैष्णवी कडे " हूँ.. असा कटाक्ष टाकत,' बास्टर्डस..' असे शब्द राहुल पुटपुटला. त्याचा तो राग बघून वैष्णवी काहीच बोलली नाही. 

काही दिवसानंतर..

( करोना चे संकट चीनच्या वुहान प्रांतातून जगात हळू हळू पसरत आहे अशा बातम्या टीव्ही वर झळकू लागल्या )
सकाळचा चहा घेऊन झाल्यावर राहुल ने कप डायनींग टेबल वर ठेवला आणि टीव्ही चे चॅनेल बदलू लागला. बिझनेस न्यूज बघत असताना विनय राहुल कडे गेला आणि म्हणाला ' पप्पा रंग पंचमी, होळी आलीये... ' तर मग?  राहुल ने टीव्ही बघत बघत उत्तर दिले. पापा... ऐकाना.. विनय वैतागून म्हणाला.. काय बोल ना बाळा... राहुल यावेळी थोडा पुत्र प्रेमाने मवाळ झाला. ते सोसायटीचे चेअरमन पाटील अंकल आहेत ना त्यांना सांगा ना प्लिझ.. राहुल म्हणाला, ' का काय झाले?  पप्पा तुम्हाला तर काहीच माहिती नसतं.. त्यांनी नोटीस लावली आहे ' यावेळी होळी नाही खेळायची सोसायटी मध्ये '....  का नाही खेळायची, त्याच्या बापाची सोसायटी आहे का? आम्ही फ्लॅट मालक आहोत,  वेळेवर मेंटेनन्स भरतोय, आम्हाला आमचे सण, उत्सव करायला कोणाची परवानगी कशाला पाहिजे? काय गं.. बरोबर ना.. असे म्हणत राहुल ने वैष्णवी ला इशारा केला, त्या पाटील ला धडा शिकवायलाच पाहिजे. सतत कायदा कायदा करतो.. गाडी पार्किंग वरून पण वाद घालतो. चल बघतो त्याला एकदाचा..
खाली पार्किंग लॉट मध्ये पाटील दिसतात..काय पाटील.. होळी रंग पंचमी का नाही खेळायची आम्ही.. आम्ही फ्लॅट ओनर आहोत.. मेंटेनन्स देतोय.. लाज वाटू द्या जरा.
मि. राहुल भाषा जरा सांभाळून वापरा.. लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. कायद्यात राहून कमिटी निर्णय घेत असते मी एकटा नाही. हि सोसायटी आपले कुटुंबं असल्यासारखे काही निर्णय घ्यावे लागतात. जगात काय चालू आहे बातम्या बघताय ना.. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात. आपल्या सोसायटीत लहान मुले, वृद्ध सुद्धा मोठ्या संख्येने आहेत.... ' निघ रे.. नको शहाणपणा शिकवू.. नको लोकांची काळजी करु लेका. आम्ही सगळे समर्थ आहेत. सोसायटीच्या पैशांवर डोळा ठेवणारे तुम्ही कसली काळजी करताय रे.. सोडा.. होळी एकत्र खेळण्याने, काही नाही होत.. असे बोलत राहुल हातात फोन काढून व्हिडियो शूटिंग करू लागला.
मि. राहुल होळी सण, उत्सव यांचे स्वरूप बघताय ना सध्या..  पाण्याचा गैरवापर होतोय.. धांगडधिंगाणा होतो हल्ली.. कोणा एका मुळे सोसायटीतील इतर लोकांच्या आरोग्याशी आपण नाही खेळू शकत... चल चल नको शहाणपणा शिकवू.. आम्हाला कायदा कळतो.. कळले का?  असे म्हणत राहुल वैष्णवी ला घेऊन तिथून निघून गेला.  हे असले कोणी केले चेअरमन आणि सेक्रेटरी.. मुद्दाम राग काढतात.. नेक्स्ट टाईम वैष्णवी तू बोलत जा अशा अर्धवट माणसांशी.. म्हणजे महिला असण्याचा फायदा घ्यायचा.. मग हे पोपट बोलणार नाहीत पुढे पुढे.. राहुल वैष्णवी ला गाडीची चावी देत म्हणाला. आता ' तू गाडी चालव' " अरे पण मला अजून कॉन्फिडन्ट नाही इतका..वैष्णवी घाम पुसत म्हणाली. '  सोड.. कॉन्फिडन्ट कोण बघतो हल्ली... कायदा महत्वाचा.. ट्राफिक पोलिसांनी अडवले की शिव्या घाल.. मग मी व्हिडियो बनवून सोशल मीडियावर शेअर करेन.. मग बरोबर यांची वाजेल.. काय बोलते.. हाहाहा.. ' राहुल काय सॉलिड डोकं लावतो तू..वैष्णवी हसत म्हणाली.. मग नवरा कोणाचा आहे असे म्हणत राहुल ने म्युझिक सिस्टीम लावत कार चा एसी ऑन केला.

काही दिवसानंतर..
( करोना मुळे लॉकडॉवून जाहीर झाले होते. बातम्यांवर बातम्या येऊन थडकत होत्या.. ) राहुलच्याच सोसायटी शेजारील सोसायटीत करोना पेशंट सापडले होते. बातम्या, सोशल मिडीया वर चे करोना पेशंट, जगातील इतर महासत्ताक देशांची अवस्था चे व्हिडियो पाहून राहुल आणि वैष्णवी खूप घाबरले होते. हे करोना विषाणू चे संकट कधी पसरले कळलेच नाही.
' घराबाहेर पडू नका"  चे मेसेज आता सोशल मीडियावरून राहुल सर्व सोसायटीतील घर मालकांना पाठवत होता,
' पोलिसांना सहकार्य करा म्हणून राहुल आणि वैष्णवी सोसायटी, शाळा, कॉलेज मधील मित्रांना सोशल मीडिया ग्रुप वरून मेसेजेस पाठवत होते. आपल्या घरापर्यंत हा वणवा पोहोचू नये यासाठी सर्व उपाययोजना तो आज वापरत होता. यावेळी किमान सोसायटी मध्ये एकता ऐक्य दाखविण्या साठी टाळी, थाळी, मेणबत्ती, दिवा त्याच्या मदतीला धावला होता. समाजाला दिखावा आणि इव्हेंट्स जास्त उद्बोधक वाटत होते, पाटील साहेबांच्या खिडकी कडे कटाक्ष टाकून तो पाहत होता, पाटील साहेबांना या देशप्रेमाच्या, ऐक्याच्या दिखाव्याची गरज न्हवती. त्यांनी हे प्रकार जाणीवपूर्वक टाळले होते. मग राहुल ने  पाटील साहेब देशद्रोही कसे?  अशी कुजबुज करायला त्याने घरापासूनच सुरुवात केली. आपल्या वैद्यकीय सेवा सुविधा यावर त्याला आता प्रश्न पडत न्हवते. राहुल समाजातल्या दांभिकतेचा आरसा होता या दिवसांमध्ये.  सोसायटी पाटील साहेबांसारख्या लोकांच्या हातात आहे हे त्याला मनात पटत होतं पण ओठावर येत न्हवतं. अहंकार वृत्ती समाजात फोफावली आहे याचे ते द्योतक होत.
लवकरच करोना चे संकट टळेल, पुन्हा राहुल सारख्या प्रवृत्ती समाज, सोसायटी,  झोपडपट्टीतील लोकं, त्यांची मनोवृत्ती, अशिक्षण, दारिद्र्य, विज्ञानवाद  यावर नाक मुरडताना दिसतील, पुन्हा संकट आले की प्रसंगी दिवे लावतील, टाळ्या, थाळ्या, ढोल ताशे, डिजे, मिरवणुका काढतील, सोशल मीडियावर हॅश टॅग लावतील पण समाजातल्या मिणमिणणाऱ्या जिवंत माणुसकीच्या दिव्यात प्रकाश वाढावा म्हणून प्रयत्न करतीलच हे कोणीच सांगू शकणार नाही. म्हणून त्या सोसायटीतील पाटील साहेबांसारखी माणसं हि गदिमांच्या या गाण्यासारखी वाटतात मला  एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक... !

वैभव  जगताप
लेखक
www.postboxmedia.wordpress.com

Thursday 6 February 2020

बेळगाव - पुणे व्हाया सातारा

बेळगाव - पुणे व्हाया सातारा

गणपतीला ऑफिस सुट्टी नसल्याने मुंबईला यावर्षी गणेशचतुर्थी ला जायला मिळेल कि नाही अशा मन:स्थितीत अडकलेलो असताना ,चार पाच दिवसाची सुट्टी मिळालीच शेवटी, बंगलोर वरून फिरत फिरत यावेळी देवदर्शन घेत मुंबईला जायचा बेत ठरवला, शक्यतो विमान प्रवास आणी व्होल्वो चा प्रवास देखील टाळला, कोंडुसकर व्होल्वो ने कोल्हापूर गाठले,आणी तिथून पुढे पन्हाळा जोतीबा असे दर्शन घेवून कोल्हापुरात एस्टी डेपो तून मुंबईला जाणारया गाडीची वाट पाहत उभा होतो,पण 'नियमीत वेळा' हे शब्द हे  फक्त या पाट्यांवर असतात,त्यामुळे अनियमित वेळेत येणारी गाडी देखील माझ्या नशिबी न्हवतीच, इतक्यात बेळगाव वरून सुटलेली 'बेळगाव-पुणे' असा कानडी चा फलक असलेली गाडी कोल्हापुरात रिकामी झाली, पुढे याच गाडीने पुणे गाठून पुढचा मुंबई प्रवास करावा असे ठरवून मी विन्डो सीट पकडली,गाडीत तशी गर्दी फारशी न्हवती पण विन्डो सीटचा मोह यापुढे सारे विसरवून गेलो होतो, कानातील हेडफोन बाजूला करून खिडकी उघडण्याचा मी प्रयत्न केला, दोन सीटला एक खिडकी अशी रचना असल्याने मी ती अर्धीच उघडून ठेवली,जरा नजर वळे पर्यंत खिडकी पुन्हा बंद झाली,हवेने बंद झाली असेल म्हणून मी पुन्हा उघडून बसलो,पुन्हा तेच खिडकी पुन्हा बंद.तीन चार वेळा असे झाल्याने मला माझ्या मागील सीट वर बसलेल्या प्रवाशाचा राग आला,आणि मी त्यावर ओरडायला मागे वळणार तर पाहतो तर काय तीन सुंदर मुली एकाच सीटवर,तसा माझा राग पटकन शांत झाला,विंडो सीटवर बसलेली तरुणी हलक्या आवाजात म्हणाली "अय्या..मीच उघडतेय खिडकी.." अस का..असू द्या..असू द्या..असे म्हणत मी स्त्रीदाक्षिण्याची प्रचीती देण्याचा प्रयत्न केला आणी सभोवताली नजर गेली तर पाहतो तर काय..मागील अर्ध्यापेक्षा जास्त सीटवर कॉलेज तरुणीचा घोळका..हे म्हणजे एका जाहिरातीमध्ये "बेटा मन मे लड्डू फुटा..अस काहीसं वाटून गेलं..फर्गुसन कॉलेज मधील या सुंदर मुली आणी त्यांच्या सोबतीला दोन त्यांच्या प्राध्यापिका..बेळगाव ला कलावती देवीच्या आश्रमात आठवड्याच्या शिबिराला दरवर्षी जातात,ते आता तिथूनच पुण्याला परतत आहोत अशी महत्वाची बातमी त्यांच्या मॅडमकडुन मिळाली,बातमी कशी काढायची याचे फारसे कौशल्य लावायची मला गरज वाटत नाही..पुढे थोड्या वेळाने मला थोडी खिडकी त्या सुदंर तरुणीने उघडी करून दिली, पुन्हा आभार मानण्याची संधी घालवण्या इतका बावळट तर मी नक्कीच न्हवतो, उत्तरादाखल मिळालेले 'हास्य' मी पुरता तीन ताड उडालो,सीट घट्ट पकडून ठेवली होती म्हणून बरे..मी उगाच पुण्यात नवखा असून स्वारगेट स्टेशन आले की मला सांगा असे मुद्दामच बोलून ठेवले,कारण त्या सर्व स्वारगेट ला उतरणार होत्या हे आधीच ऐकले होते मी.. जरा खिडकीच्या काचेच्या परावर्तनात मी तिला पाहण्याचा प्रयत्न केला, गोड गोजिरी,फारसे कुरळे नाही पण लांब सडक केस,गालावर स्पर्श करणारी बट, हसल्यावर गालावर पडणारी खळी,पाणीदार डोळे..मी तीला चोरून पाहतोय हे तीच्या लक्षात आल्यवर तीने पापण्यांची पिट पिट करत मैत्रिणीशी काहीशी कुजबुज केली..आणी तिघी हसत्या झाल्या..पुढे गाडीचा वेग वाढता झाला तसा या सर्व मुलीनी अंताक्षरी ला सुरवात केली..सुरवातीला मला वाटले मराठी गाण्याची अंताक्षरी असावी कारण राधेच्या भजनाने सुरवात करून सर्व देवादिकांच्या भजनाच्या गाण्यांनी दोन ग्रुप मध्ये शेवटच्या शब्दावरून त्या त्या देवांच्या भजनाची गाणी अतिशय सुरेख आवाजात त्या सर्व गात होत्या,मला खूप आश्चर्य वाटले,कोल्हापूर पासून सातारा आणी पुढे पुणे हे अंतर बरेच होते,पण न थांबता सर्व देवांच्या भजनांना ऐकून मी दंग झालो.हा अनुभव मला नवीन आणी विलक्षण असाच होता.मुलींवरचे संस्कार आज अशा दिवसामध्ये पाहणे याची देहा याची डोळा मला पाहायला मिळाले,शहरातल्या मुलीची किव येवून न जाणे हे असेच काहीसे वाटत होते.कानातील हेडफोन  तसेच गुंडाळून ठेवून दिले आणी मीसुद्धा भजनांच्या सुरात तल्लीन झालो..पुढे पुणे आल्यावर भजनाला पूर्णविराम मिळाला, हा नवीन अनुभव बरच काही शिकवून देखील गेला.पण स्वारगेट स्टेशन आल्यावर मला स्टेशन आल्याची जाणीव करून दयायला ती विसरली नाही,.."अय्या..स्वारगेट आले की.." मी फक्त तिच्या डोळ्यांमध्ये पाहता झालो,आणी तीने पुन्हा नुसतीच पापण्यांची पिट पीट केली..या गोष्टी ला एक वर्ष सरून गेले पण आजही 'ती' गोष्ट माझ्या स्मरणात राहून होती. या वर्षी पुन्हा गणपतीला पुण्याला जायचा बेत झाला.काकांच्या गाडीने मी आणी काका दोघेच प्रवास करत पुण्याला गणपतीसाठी पोहचलो,काकांच्या नेहमीच्या हॉटेल वर राहण्या ऐवजी मी काकांना आपण गौरीश हॉटेल ला राहूया असा सल्ला देवून झालो,काकांनी सुद्धा तो मान्य केला.गौरीश हॉटेल मध्ये राहण्याचा माझा हेतू काकांना पुरता कळलाच न्हवता..गाडीत तिच्या बोलण्यात 'गौरीश' हॉटेल शेजारी ते राहतात याचा उल्लेख आला होता..आणी यावेळी अशी कोणतीही संधी दवडायची नाही हे मनाशी पक्के ठरवूनच मी  पुण्यात पावूल टाकले होते..
.................

वैभव जगताप

Thursday 14 November 2019

दगडाच्या देशा

दगडाच्या देशा..

नेहमीच्या रस्त्याकडेच्या वाटेवर एका राजस्थानी भंगारवाल्याचे दुकान लागते. मी अधुन मधुन काही पुस्तके मिळतात का तिथे म्हणून सहज फेरी मारत असतो. कॉलेजात असताना हीच भंगारवाल्यांची दुकाने माझ्या साठी लायब्ररी चे काम करुन जायची
.'स्वस्तात मस्त' असे. साहीत्याच्या प्रकाराच्या भानगडी त्या वेळी मला ठावूक नसायच्या अगदी चंपक, चांदोबा,हिंदी सिनेमा गीते, मराठी बहारदार चित्रगीते ,मराठी वाण्गमयाचा गाळीव इतीहास ते उर्दू साहीत्य विश्वकोश, शंकर पाटील,पुल,कुसुमाग्रज, असे अनेक साहीत्यीक, कवी- नवकवी, विद्रोही, सुद्धा इथेच भेटले मला, लोकांच्या घरी अडचण झाली के हे साहीत्यीक या दुकानात भेटायचे मला, थोडक्यात समृद्ध जिवनात अशी ठिकाणे अडगळीचीच असतात, पुस्तकांच्या रिटायर्डमेंट ची ठरावीक अशी आयुश- वये सांगता येणार नाहीत मला, पण वजन काटा मारण्याच्या अनेक पध्दती पासुन भंगाराचे समाजकारण,राजकारण ते अर्थकारण सार काही दुनियादारी या इथेच शिकलो मी, राजस्थानी साहीत्य,संस्कृती ची ओळख या इथेच भंगारवाल्या माझ्या राजस्थानी मित्रांकडुन कडुन झाली.
आज 'कामगार डे' च्या दिवशी हे दुकान चालु होते.वेळ होता म्हणुन गेलो, मालक न्हवता आज, मालकाच्या पाठीमागे त्याचे दुकान संभाळणारा 'गोलु' नावाचा मुलगा बिहार वरुन त्याच्या कडे कामाला आला होता. हे पोरग तसे दहा बारा वर्षाचे, काळे सावळेसे ,मी गेलो तेह्वा हे पुस्तकात तोंड खुपसुन काही तरी वाचत बसले होते. मी हळुच त्याचे त्याच्या नकळत फोटो घेतले. काही वेळाने माझ्याकडे निरागस बघत क्या चाहीये असे त्याने मला विचारले?? मी बोललो सेठ को मिलना हे. सेठ शाम को आयेगा असे बोलुन तो पुन्हा काम करु लागला. मी तो पर्यंत त्याचे नाव गाव विचारुन झालो. अभ्यासाची खुप आवड पण घरची परीस्थीती त्याला मुंबईला खेचुन घेवून आली. शाळेत जाता आले नाही तरी इथेच बसुन जे मिळेल ते वाचुन अभ्यासाची आपली तहान भागवतो. महाराष्ट्रातील अनेक शिक्षण सम्राट यानी 'महात्मा फुले, सावित्रिबाई फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा सांगत स्वता:ची विद्यापीठे , आंतरराष्ट्रीय शाळा स्वता:ची नावे राजकीय व्यासपीठावर मोठी करायला वापरली, त्याना अशा शिक्षणापासून वंचीत मुलांसाठी काहीच करता येवू नये अशी ही 'सार्व शिक्षा' थोडक्यात शिक्षणाची ' सारवा सारव' या यांत्रीक शिक्षणसंस्था पध्दतीतुन रोबोट तयार करण्याचे कारखाने तयार झालेत. दफ्तर आणी पालकांच्या इछा अपेक्षा लादलेली ही निरागस मुले देखील आज मला 'अधिकृत बालकामगार' च वाटू लागली आहेत, 'बालकामगार कायदा मोठा की गोलु आणी त्याच्या परीस्थीतीची, जवाबदारीची त्याची जाणीव, त्याचा संघर्ष ? काहीच कळत न्हवते. गोलु च्या जिद्दीला सलाम मनातुनच दिला. जिवणातील हाच संघर्ष त्याचे 'शिक्षण' त्याला येणारे अनुभव त्याचे 'मार्गदर्शक शिक्षक' ठरणार आहेत. डोक्यावरचा सुर्य जास्त तळपू लागला होता, इतक्यात हातातल्या महागड्या मोबाईल वर 'दगडाच्या देशाचे आणी कामगार डे' चे मेसेजेस येत होते. दगडाच्या देशातील लोकांच्या सामजीक जाणीवा का इतक्या बोथट झाल्या आहेत हे त्या 'रद्दीकडे' पाहून कळायला लागले. सत्तेच्या संघर्षात हे असे अनेक प्रश्न जाहीरनाम्या पुरतेच राजकारण्यानी ठेवलेत. वर्तमान पत्रापेक्षा पुरवण्याची तहान वाचकाना भागत नाही. आणी ती पुरवणे हा 'व्यवसाय' झाला आहे. सरकारी आकडेवारी ही मटक्याच्या धंद्या सारखी झालीये त्या मुळेच असे गहण प्रश्न स्वातंत्र्यानंतर ही तसेच भिजत पडले आहेत. ज्या दिवशी या महाराष्ट्रात असा कोणी गोलु 'कामगार' दिसणार नाही त्या दिवसानंतर दगडाच्या देशाचे मेसेजेस मी पुढे पाठवत जाईन असे मनाशी ठरवून टाकले.
क्या 'दिया' हमे, क्या सिखायेगा 'जलना'
..जलकर हमने सिखा हे 'दिया' बनना !!

वैभव जगताप

Friday 4 October 2019

अंगार






अंगार !! 


सांगली जिल्ह्यातील विटा शहरगाव, सतत गजबजलेले नसले तरी सोमवारच्या बाजाराला मंडईत पाय ठेवायला जागा नसते इतकी आग्ग बाई अरेच्चा गर्दी असते, विट्यापासून जवळच असलेल्या एका छोट्यश्या खेडेगावची ही कथा.

विट्याला जाणार्‍या एस.टी ची वाट बघत सनज्या पिपळाच्या झाडाखाली पारावर बसला व्हता. ऐन तारुण्यात चांगली पोरगी बघून आय बापान लगीन लावून दिल व्हत, लगीन झाल साकर कारकान्यावर कामाला जाताना रोज आयला जातू बोलणारा गडी आता बायकूला हासत हासत बाय बाय करायला लागला व्हता. दिस बघता बघता सरत गेले, चुलीजवळ फुकरन घेऊन बसणारी म्हातारी आय चुलीतल्या धुरातून येणार्‍या पांढर्‍या धुरा सारखी केसां न भी पांढरी झाली आता चूल गेली रॉकेलवर चालणारी बत्ती उजेडासाठी आणी स्टोव सयपाक करायला म्हातार्याने घरी आणून दिला व्हता, ऐतवारच्या बाजाराला तूर इकली त्या पैशात हे सामान आल, सून बाय पांढर्‍या बत्तीच्या उजेडात भाकरया भाजीत भाजीत गालातल्या गालात हासीत व्हती, संजया ला वाटल ही त्याच्यावरच हासतीया तसा त्यो जाम भडकला, हातात आलेल पायतान त्यान तिच्यावर भिरकावल तिच्या पायातल्या जोडव्यावर लागल्याने तीने तुम्हासनी काय कळत का नाय अस म्हणत स्वताच्या पोटावर हात फिरवत म्हणाली" बाळाला लागल आसत म्हंजी ?? घरात बत्ती पेटली व्हती पण संजया च्या डोसक्यात काय अजुन पेटत नव्हती, आय न रांजापाशी चुळ भरली आणी हातातल्या कागदावर शिल्लक राहीलेली मशेरी परचुंडी करत दाराच्या वरच्या दिवळीत कोंबून ठेवली, त्या दिवळीत ती स्वताच्या केसांचा पुंजका पण केसाळवाल्याला देऊन सुया, बीब, टाचण्या, रीबीन, क्लिपा घ्यायला ठेवत असायची. आयन कमरवर हात ठेवीत एक बोट तोंडात दातावर घाशीत संजया ला इशारा केला, इकड य" . परत पायतान फेकून मारलस पोरीला तर कंबारट मोडीन, पोटुशी हाय ती, बाप व्हनार हायीस तर जरा पोकात पणा येऊ दी की, संजया न नुसती मान डोलावली अन् खाली मान घालत बायको सुमीच्या तोंडाकड बघत हसत राहीला सुमीन रागान तोंड फिरवून नाराजी दर्शिवीली. बायको सुमीच्या तोंडाकड बघत हसत राहीला सुमीन रागान तोंड फिरवून नाराजी दर्शिवीली. म्हातारीन बुरनुस अन् एका बाजूला घोंगडी आन्थरली सून टोप उचलून आणतेय बघून म्हातारी रागन संजया कड बघू लागल्या वर संजया चाटदिशी उठला आन् सुमीच्या हातातला टोप घेत तू बस म्या आनतु सगळ बाहीर, अस म्हणत भाकरीच टोपल अन् रांजनातल्या पाण्याची तौली भरून घेऊन आला. आता त्याला भी गालातल्या गालात हसू येत व्हत पण संस्कारात आन् सासुरवासात वाढलेल्या पोरीनी अजुन तरी नवर्‍यावर चपपल कधी फेकल्याची ऐकीवात नाही. जेवण झाल्यावर सासूने भांडी घासली तर सुनेने लोटून काढण्याआधी संजयाने बुरनुस आणी घोंगडी घड्या घालून ठेवली, संजया पाठीमाग हातात हात घालून वर आकाशात पडलेल चांदण पहात पिपरणीच्या शेजारी येरझार्‍या मारू लागला. हातातली तंबाखुची पुडी काढून तंबाखू वर चुना मळू लागला. इकड आयन सुमीच्या डोस्क्याला तेल लावायला घेतल व्हत. संजया ला आकाशात चांदण बघताना बघून दोघी सासू सुना गालातल्या गालात हसायला लागल्या. म्हातार परगावाला लग्नाला गेल्याल ते काय पाव्हन्याकड असल्यान दहा चार दिस तर तिकडच असत. रात्र झाली काळोख झाला आता सगळी एकदम शांत झोपी गेली व्हती. आन् इतक्यात..

....क्रमश:





वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com


मास्तरांचे विद्यापीठ



मास्तरांचे विद्यापीठ ! 

'मौजे आंबेगाव' सांगली जिल्हा, 'कडेगांव' तालुक्यातील संपुर्ण साक्षर असे आदर्श गाव. गावाच्या ग्रामपंचायती कार्यालया बाहेर नोटीस बोर्डावर जिल्हा परिषद निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या की सगळ्या शाळेच्या मास्तरांची 'कडेगांव' तालुका वारी पक्की ठरलेली असायची, बाजाराच्या दिवशीच तालुक्याला जाणारे समदे यावेळी तासाला तालुक्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, पक्ष कार्यालयात, बाजारात, पाराच्या झाडाखाली नाहीतर 'सरकारी देशी दुकानात' हजर असायचे निवडणुक प्रचार, पोलिंग बूथ असो की मतमोजणी समद्या कामाला हे जुपले जायचे, तालुकाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष,आमदार,खासदार,पक्षनेते, अपक्ष नेते समद्याना यांचा मुजरा व्हायचा. गाड्या भरुन भरुन नोटा तालुक्यावरुन गावागावात पोहचायच्या. वर्षभर अन्ना वाचुन दुष्काळ भोगलेले रात्री कोंबड्या, मटणावर तुटून पडायचे. नेत्यांच्या ,सरपंचाच्या वाड्यावर न अन मळ्यात रात्री फक्कड लावणी जमायची, पैसा उधळला जायचा. मास्तरांचे घोळके बीयर च्या बीयर बाटल्या रेचवायला दंग व्हायचे, इतिहासाचे 'मोहीते मास्तर' तोंडात चना,चिवड्याचा चकना टाकत दारुचा इतिहास सांगुन जायचे तर, भुगोलाचे पिसाळ सर तोंडातील तंबाखू बाजुलाच थुंकत..'मदीरेची उत्पत्ती,कालखंड सांगणार इतक्यात त्याना मद्य उत्पादन फायद्या- तोट्यावर गणिताचे 'जावळे' सर दोन पेग आधीच रेचवून ग्लास पुढे करायचे, तोच इंग्रजीच्या साने मास्तरानी देशीवर टिका करत नाक मुरडत इंपोर्टेड 'रोझ वाइन' चकचकीत ग्लासात घेत तुछ कटाक्ष टाकून... तुम्ही सगळे कसे अजुन मागास आहात... 'यु आर नॉट जंटलमन कलीग्स,.....यु पीपल नॉट ड्रिंकिंग इंग्लीश...असे तसे काही बाही बरळत बरळत शेवटी स्कॉचss शब्द बाहेर आला आणी हे महाशय नुसत्या वाइन मध्येच आडवे झाले. साने मास्तरांचा मुलगा अमेरीकेत उच्च शिक्षण घेतोय, आपल्या 'डॅड' साठी मधुन मधुन भारतात आला की आणतो एखादी काळी निळी वाइन ची बाटली. इतक्यात कोणाच्या तरी तोंडात 'तकीला पाहीजे होता रे श्याss असा उल्लेख आला पण ते काय असते हे माहीत नसल्याने मराठीच्या 'जोशी' सरानी तोंडातल्या तोंडातच माघार घेतली. तमाशा साहीत्य संस्कुती बद्दल भरभरुन बोलता बोलता तिथल्या तमासगीरीच्या पायातल्या घुंगरांवरुन बोटे फिरवत गळ्यात हात घालणार..इतक्यात 'अय काय बोलयचय ना ते लांबन..पायतान काढाय लावू नका' तमासगीर बाई भडकलेल्या बघुन संस्कृतचे कुलकर्णी मास्तर लगेच 'अरे बापरे हीss हीss ( असे खोटेच हसत) सॉरी हा...वेरी सॉरी..मला काय ती जोश्यांची 'शंकुतलाच वाटली' हाहा असे म्हणत.. 'जोशी मास्तराना डोळा मारत' जरा आलोच हाss डोळ्यावर पाणी मारून' असे म्हणत आत जे गेले ते बैठकीला परत न येता, व्हराड्यातच बसुन 'विस्कीचा विथ सोडा... लार्ज ग्लास' आस्वाद घेवू लागले. सगळा तमाशा चालु होता' ..आताची शिक्षण पद्धती कशी चुकीची आहे.. इथपासुन ते 'मंत्रीमडळात आणी निवडणूकीत 'शिक्षकाना जास्तीत जास्त आरक्षण मिळाले पाहीजे आणी... 'एक शिक्षकच देशाचा पंतप्रधान झाला तरच तो हा देश आपण 'तारु' इतक्यात ...'दारु....कोणीतरी मध्येच बोलले.. झिंगलेले भुगोलाचे 'कांबळे मास्तर' आता डुलायला लागले होते. सगळा प्रकार डोळ्यानी शांत पणे पाहून साधे सरळ दिसणारे सायन्स शिकवणारे निवृत्त 'यशवंत कदम' मास्तर या तरुण शिक्षकांच्या व्यवहारावर काहीच बोलत न्हवते. काळ बदलला आहे, "राजकारणच 'शिक्षण' आणी शिक्षणाचेच ' राजकारण' झालेय हे त्याना माहीत होते की काय त्यानी हातातली काठी सावरली, डोक्यावरची गांधी टोपी घालायला आता शाळेच्या पोराना बी लाज वाटते, पण कदम मास्तरांना स्वता:ची गांधी टोपी सावरताना, आणी विसरताना कधीच पाहीले न्हवते. हातातली काठी, चेहऱ्यावर लख्ख तेज, करारी बाण्याचे आणी सरळ स्वभावाचे असे उच्च बुद्धीवादी विचारांचे' ते या व्यवस्थे विरुद्ध लढण्याच्या भानगडीत कधीच पडले नाहीत. आता मास्तरांचे वय झाले होते, 'आवाजातल्या हरकती आणी डोळ्यात दाटलेले पाणी, शरीरावरच्या स्पष्ट दिसणाऱ्या सुरकुत्या आता आणखी स्पष्ट दिसत होत्या, झिजलेल्या चपला आता 'करss करss' असा आवाज करत न्हवत्या.शाळेत वर्गात मास्तर येतायत हे शाळेच्या तासाच्या घंटे पेक्षा मास्तरांच्या चपलांच्या आवाजानेच आधी समद्या वर्गाला कळायचे. आज मास्तरांची दोन्ही पोर सैन्यात मोठ्या हुद्द्यावर देशाची सेवा करतायत...ऱोज सात किलोमीटर सायकल तर कधी चालत शाळेचा बिकट प्रवास आणी नोकरी करणारा मास्तर...."झिंगुन आडवे झालेल्या एक एका शिक्षकाच्या 'प्रेताला' त्यांच्या घरी व्यवस्थीत पोहचवायची जवाबदारीचा 'आदेश' सर आंखोपर ठेवून पुढची पिढी सुरक्षीत करत होता. डोळ्यात पाणी दाटुन आले...'गुरुदक्षिणा' शब्द मराठी साहित्य विश्वशब्द कोशातुन कुठे हरवू नये याची भिती वाटु लागली होती आता मला..



वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

मऱ्हाठी देशा / मराठी द्वेशा / मराठा दशा





मऱ्हाठी देशा / मराठी द्वेशा / मराठा दशा 



 


'शिवाजी पार्क ते गोरेगांव' बेस्ट बस प्रवास. पावसाळा सुरुच, नेहमीचेच त्रासदायक खड्डे, खिडकीतून बाहेर डोकवताना टिपटिपणारे पाणी सहज तळहातावर झेलत प्रवास सुरु होता, पुन्हा पुन्हा टपोऱ्या थेंबांकडे कुतुहलाने पहायचो, 'आस्वाद हॉटेल' च्या पुढे बस थांब्यावर बस थांबली, एक दोघे प्रवासी उतरले आणी चार पाच स्त्री पुरुष प्रवासी बस मध्ये चढले. बस चालक आणी बस वाहक नेहमीच्या शैलीत एकमेकांशी घंटीने संवाद साधत आणी हाताने सुद्धा इशारा करत होते. बस वाहक माझ्या शेजारी बसलेल्या इसमाकडे गेला. आस्वाद बस थांब्याच्या पुढे बसमध्ये चढलेले ते सर्व मराठी भाषिक प्रवासी होते. त्यामुळे बस वाहक छप्पन इंची छाती फुगवत मराठी चा स्वाभीमान ठासून पुरेपुर कोल्हापूर भरला होता. समोरचा प्रवासी मराठी असूनही वाहकाशी हिंदीत संवाद करत म्हणाला, ' दो बॅंड्रा देना' , वाहकाला कदाचीत ही गोष्ट आवडली नसावी, त्याने मराठीतच त्याला सात रुपये सुट्टे द्या असे सांगीतले. "छुट्टा नही हे" समोरुन खिशात नुसताच हात फिरवत उत्तर आले. पुढच्या वेळेपासून सुट्टे ठेवत जावा. असे म्हणत वाहकाने मराठीत त्याला हटकून बोलून दाखवले. वाहकाने त्याच्या हिंदीला दाबल्याचा आनंद मला झाला. काय त्याचा तो मराठीचा आग्रह, त्याचा मऱ्हाठी बाणा आणी तोरा, सरकारी नोकरीत महाराष्ट्राची शान ठेवली गड्याने असे मनात म्हणत मी त्याच्या बद्दल आदर वाढवून बसलो. मनात त्याच्यामुळे मराठी चा स्वाभीमान वाढला असल्यामुळे मी देखील छाती काढून बसलो. शेजाऱ्यांला फारसा फरक पडल न्हवता असे दिसत होते. त्याने शेजारच्या बाकावर बसलेल्या त्याच्या कॉंव्हेंट मध्ये शिकणाऱ्या मुलीच्या हातात मोबाइल देत सांगीतले ' प्लिझ कीप इन युअर पॉकेट बेटा' मी थोडा हळूच वाकून त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण जाड जाड भिंगांच्या चष्म्यामुळे हा चष्मा आहे की बस प्रवासात सुद्धा हेल्मेट सक्ती केलीय की काय असे वाटून राहायची वेळ आली. पुढे प्रत्येक घंटी ला बस थांबत होती आणी प्रवासी चढत आणी उतरत होते. पुढे वांद्रे स्टेशन आले आणी माझ्य शेजारील इसमाचा बॅंड्रा चा स्टॉप आला आणी तो उतरला. पाच दहा बांधकाम क्षेत्रातील भैय्या गॅंग बस मध्ये चढली आणी माझ्या पाठीमागील जागेवर एकत्र बसण्यासाठी सरसावली त्यातील एक भैय्या माझ्या बाजुला बसला होता. बस वाहक त्या सर्वांकडे बघून हलक्या आवाजात म्हणाला ' किधर जाना हे दादा' खाडकन कोणी कानाखाली मारावी तसे वाटले. मराठीचे शब्द आता हिंदीची भाषा घेवू लागले होते. त्या वाहकाचा स्वाभीमान तळ्यात मासे पकडताना गळाला लागतो तसा लागला होता. वाहकाने शेजाऱ्याचे तिकीट काढताना ' छुट्टा हे क्या ' असे विचारले समोरून नही हे. असे म्हणत तो इसम त्या वाहकाला किम्मत न देता' ' ए फुलन का तोसे मुकादम का कहील बा..' असे काहीतरी पुटपुटत मागे जोरजोरात बोलु लागला. हतबल बस वाहक त्याना सुट्टे पैसे देत पुढच्या थांब्यासाठी घंटी जोरात वाजविता झाला. मला तो मुंबईच्या सामन्य मराठी माणसाचा प्रतिनिधी वाटला. मराठी ची गळचेपी झालीये, होते आहे पण कोणाला त्याचे सोयरे सुतक नाही. न राहावून बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या, साहेब इंग्रजी शब्द असून मराठी शब्दकोशातील मराठी शब्द वाटायला लावणारे सैनिक आठवले, मराठीच्या अस्मितेवर लढणारी शिवसेना वाढताना आमच्या डोळ्यांनी पाहीली, छत्रपतींच्या नावाने मतांची भिक मागणारा औरंगी विचारांचा भाजपा समोर नागडा नाचताना समृद्ध होताना पाहतोय. महाराष्ट्राच्या राज्यकारभाराच्या बसची धुरा भाजपा चालक म्हणून तर शिवसेना वाहक म्हणून करत आहे. सेना वेळो वेळी धोक्याची घंटी देत आहे पण सेनेच्या घंटीला भाजपा घंटा महत्व देत नाही,पण चालक सत्तेच्या नशेत गाडी हाकतोय. परीणाम काय ते जनतेला माहीत आहे. 


 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

शिक्षण क्षेत्रातील बाजारी राज कारण

शिक्षण क्षेत्रातील बाजारी राज कारण

'भारत गिते' याची राज ठाकरे यांच्या घरासमोर आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी कानावर आली, रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधील कला शिक्षक आणी आमचा शाळेतील सहकारी, बालमित्र... त्यानंतर अनेक दिवसांची शिक्षण क्षेत्राबद्दल लिहायची इछा होती, पुन्हा सर्व गोष्टी डोळ्या समोर हळू हळू सरकू लागल्या, शिक्षण क्षेत्रातील बाजार एका लेखात मांडता येणार नाही पण या विषयाला न्याय मिळवून तो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न जरुर करतोय.
मध्यमवर्गीय कामगार, मुस्लिम बहुल वस्तीतील वस्तीतली 'संत द्न्यानेश्वर विद्यालय' ही शाळा, आणी त्या शाळेची प्रत्येक वर्षी दहावीचा निकाल १००% लागावा ही प्रतिष्ठा म्हणा किंवा परंपरा, ती प्रत्येक वर्षी राखली जावी यासाठी संस्था आणी शिक्षक वर्ग यांची मुर्दाड दंडेलशाही, इयत्ता दहावीला विध्यार्थी पोहोचे पर्यंत त्याची कल्पनाशक्ती, सामाजिक जाणिवा, इतर क्षेत्रातील त्याच्या आवडी निवडी, क्रिडा, शास्त्रीय समाजशास्त्रीय आवड, नागरीक शास्त्र आणी इतिहास भुगोल यातुन त्याचा बदलणारा दृष्टीकोण याचा कसलाही सारासार विचार न करता, हे सर्व विषय डावलून फक्त सर्व च्या सर्व विध्यार्थी दहावीच्या बोर्ड परीक्षेत कसेही उत्तीर्ण होतील यावर भर देताना त्या मुलाना मारुन धोपटून त्याला शिक्षण क्षेत्राची अनास्था वाटेल अशी कृत्ये घडवली जात होती. कदाचित त्यांचा हेतू विद्यार्थी घडविण्यापेक्षा परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याकडे जास्त असावा आणी तो त्यावेळी त्याकाळी विद्यार्थी वर्तनानुसार योग्य ही असू शकतो पण आता काहीसे चित्र बदलले असेल म्हणुन त्या त्या शिक्षकांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला, ज्या शिक्षकानी असे प्रकार केले त्यातील अनेकानी आपल्या पाल्याबरोबर परदेशवारी केल्यानंतर खंत व्यक्त केली, गणिताचे शिक्षक ज्यानी अनेक पिढ्याना गणिते, भूमिती, प्रमेये शिकविली ते त्यांच्या मुलाबद्दल बोलत होते, अमेरिकेत आयटी क्षेत्रात आहे माझा मुलगा पण वेळ नाही मिळत. आम्हाला नासात फिरायला घेवून गेला होता. वेळ नाही, सतत टेंशन, डोक्यावरचे केस पिकून पांढरा कापूस झाला आहे. मी विचारले सर शाळा कशी आहे ? काय विचारू नकोस आता सेमी इंग्लिश झालीये शाळा, "आपटे" बाई गेल्या नंतर श्री. अब्दुल रझाक खत्री आणी संस्थेच्या चेअरमन डॉ. अमिता सुर्वे यांच्या सारख्या शिक्षण क्षेत्रासाठी आणी गरीब विद्यार्थी यांच्या विषयी आस्था, समाज भान जपणारी व्यक्ती शाळेची धुरा आता योग्य रितीने सांभाळताना बघुन आताच्या शिक्षकांबरोबर विद्यार्थी, पालकवर्ग देखील समाधानी झाला आहे, तरीही मराठी शाळा म्हण्टले की आताच्या पालकाना अनास्था वाटू लागली आहे किंवा जागतीक स्पर्धेत आपला पाल्य मागे राहील ही भिती वाटू लागली आहे,मराठी शाळा बंद होण्याची अशी अनेक कारणे असू शकतात, बेस्ट वसाहती मध्ये फिरून मुलाना शाळेत यायला सांगावे लागते, प्रसंगी हात जोडावे लागतात, आमच्या नोकऱ्या सुद्धा संस्था आणी त्यांच्या वेतन भत्त्यावर वेतन आयोग मानधनाप्रमाणे टिकल्यात सर्व पालक आता इंग्रजी माध्यमात शाळेत मुलाना प्रवेश मिळवत आहेत, शाळेचे अती धार्मिक संस्कार मुलांचा भाबडेपणा बळाविण्याचे कारण देखील आहे आता या गोष्टी पहिल्या पेक्षा कमी झाल्यात. मराठी शाळा वाचविणे या पेक्षा शिक्षकाना निवृत्ती पर्यंत नोकरी कशी वाचविता येते का याची चिंता जास्त होती. शाळेतून एखादा नावाजलेला क्रिडापट्टू , समाजकारणी, लेखक , शास्त्रज्ञ, अर्थ ,भूगर्भ, अवकाश शास्त्रज्ञ देशासाठी मोठ्या प्रमाणात नाही घडू शकले, रोजगारी किंवा नोकरवर्ग तयार करण्याचा कारखाना घडला शेवटी याची जाणिव सराना झाली हे मह्त्वाचे होते माझ्यासाठी. खुप खुप बोलायचे आहे तुझ्याशी वेळ मिळाला की बोलू असे म्हणून सरानी व्हॉट्स अप चॅट आवरते घेतले.
राज्यशास्त्र आणी समाजशास्त्र फार मनावर घ्यायचे नसते रे, ते फक्त शिकवायचे विषय असतात, आंतरराष्ट्रीय घोटाळेबाज महाविद्यालयीन प्राध्यापकाचे शब्द आठवले.
रहेजा महाविद्यालयाने आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत या शिक्षकाने 'कृष्णकुंज'बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो आमचा बालमित्र भारत गिते हा संबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. परंतु कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यामुळे राजसाहेब यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याचं शिक्षकाने एका पत्रात लिहिलं होतं. त्यानुसार हा शिक्षक आज दुपारी बाराच्या सुमारास कृष्णकुंजबाहेर पोहोचला आणि काहीतरी पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राजसाहेब ठाकरेंच्या निवासस्थानी पोलीस तसंच त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांनी शिक्षकाला रोखण्याचा प्रयत्न केला. तरी कोणतातरी द्रव पदार्थ त्याने प्राशन केला असल्याचे निष्पन्न झाले, यानंतर त्याला उपचारांसाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता हळू हळू त्याची दखल घेतली जाईल पण मागता येईना भिक मग मास्तरकी शिक. हे असेच चालणार का ?
आणखी अशी अनेक प्रकरणे आहेत, शिक्षण क्षेत्राचा बोऱ्या वाजला आहे. शिक्षक आणी संस्था यांच्यातील राजकरणाने निचतम पातळी गाठली आहे. मुलांचे भविष्य टांगणीला लागले असताना फक्त ॲडमिशन किती झालीत आणी मतदान आणी निवडणुकांमध्ये बैल हवे असतात या बैलांचा नंदी बैल झालाय.
मध्य मुंबईच्या प्रतिष्ठित शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या महाविद्यालयातील एका भाषा विभागातील प्रकार जेव्हा समजला त्यावेळी शिक्षण क्षेत्रातील राजकारणाची निचतेची सिमा गाठली गेल्याचे दिसले, प्रकार निंदनीयच होता. एका माजी शिष्याने त्याच विभागाच्या प्राध्यापिकेची असलेली जागा मिळविण्यासाठी त्यांच्यावर विभागप्रमुखाशी संगनमत करीत आरोप करत त्याना पदच्युत केले होते, मनुवादी विचारांनी प्रेरीत असलेला हा प्राध्यापक पुढे ही जागा टिकवू शकला नाही आणी शिक्षण क्षेत्रातील गुरु शिष्य नात्याचा देखील इथे विचार झाला नाही. केवळ अर्थाजन आणी शाश्वत नोकरी उपजीविका भागविण्यासाठी शिक्षण क्षेत्र मर्यादीत राहीले की काय ? बाजारी पणा सर्वच क्षेत्रात बोळावला आहे पण शिक्षण क्षेत्रातील या बातम्या शिक्षण क्षेत्राला आलेला रंडवेपणा स्पष्ट दाखवतो. आपला पाल्य मोठा झाल्यावर शिक्षक व्हावा असे आज किती जनाना प्रामाणिक पणे वाटत आहे यावरून तुम्ही स्वता:ला आरसा दाखवा. 



 वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com

नवस





२००१ मध्ये लिहलेली कथा...

" नवस "

‘पिरोबा’च्या देवीची येस वलांडली की म्हाडकाचा ‘मळा’ लागतो. ‘पिरोबा’च देवाळ तस खुप जुनं, पण जत्रंलाच आया ‘बाया’ नवसाची कोंबडी-कोंबडा कापाय तथं यायची, नायतर एव्हांना तिकडं कोण डुंकत सुद्धा नाय. माळावरच्या पिपंरनी मधी मधी गारवा द्यायला उभ्या हायत्या अशा वाटायच्या, तशा पाऊलवाट रुंद टेकाडवरन जाताना कुठं आंब्याच झाडं तर कुठं जांभळाची झाडं लागायची. ‘येतगाव’च्या जत्रेच्या निमित्तानं तिथं जायला व्हायचं ते बी ‘दाजी संग. त्याच येतगावच्या माळावर उसाच्या बांधाला धनगराची काय पाच-दहा घरं व्हंती. दाजी म्हणजी आमचा ‘म्हातारं’ म्हणजा आमचे ‘आजोबा’ समद्यासंग त्याचं चांगल व्हंत. श्येमा वडार, बापू वडार, नाम्या लव्हार, येश्या धनगुर अशी बरचशी मंडळी त्यांनी कामानिमित्त बांधून ठेवली व्हती.
येतगांवच्या जत्रेला येनी-देनी भागवायला दाजी यांच्या घराकडं तमाशा झाला की फिरकायचा.
त्यात बापू वडारच्या कोपच्या मणतलं पाणी इतकं गारगार असायच की‘ शहरातले’ फ्रिज फिके पडतील अशा उन्हाळ्यात, कडक उन्हात सुद्धा काव्या मडक्यातलं पाणी पिताना जीवाला खूप बरं वाटायच. ‘बापू वडूर’ अन् त्यांचा भाव लाल तिखाट चटणीला लय हावरे होते असं आम्हा बच्चे कंपनीला आजी कडनं माहित झालं व्हंत. तो दोन-दोन ‘बरण्या’ चटणी खायचा. आम्हाला लय गमजा वाटायची त्याची.
आजोबा दोन खांद्यावर घेऊन आम्हाला ‘तमाशा’ दावायचे. तिथनं पुढं आमी समदी या लोकांना भेटायचो. असच ‘येश्या’ धनगुराच्या घरी गेलो तवा त्याच्या शेजारच्या शिरपतीची ‘च्या’ पिती पिता त्यान सांगितलेली शिरपतींची गोष्ट आज देखील कुठं मेंढर दिसली, की ‘चहा’ प्यायला घेतला तरी झरकन डोळ्यापुढं उभी राहते. आता ‘नवस’ हा शब्द खूप कमी कनावर पडतो. पण जत्रा जवळ आल्या की ब-याचदा या शब्दाची आठवण येते आणि शिरपतीची ती गोष्ट न राहावून आठवायला लागते.
शिरपत आणि सईला त्याच्या लग्नानंतर मूल नव्हते. मेंढपाळीच्या व्यावसायामुळे त्या दोघानाही या गावांतून त्या गावामध्ये सतत स्थलांतर करावे लागे... आपल्या १०-१५ मेंढ्याच्या कळपामध्ये... एखाद दुसरी शेरडं पण व्हंती... म्हातारीचे आणि सईचे पटत नसल्यामुळे शिरपती तिच्यापासून दूरच रहायचा... दोघा नवरा-बायकोला मूल नव्हते. अनेक उपास-तापास करून झाले... भोळ्या-भाबड्या त्या दोघांच्या वाट्याला हीच काय ती शोकांतिका... फक्त गावच्या मुक्कामी दुपारच्या भाकरीच्या वेळेला आलेल्या कडक लक्ष्मीच्या माणसाला सईला दिलेला प्रसाद आणि सईने (केलेला) मागितलेला नवस यानंतर काही दिवसांनी मु.पो. चिखलीला असताना सईला दिवस जाऊन पुत्ररत्नाचा लाभ होतो... नवसाला देवी पावली, म्हणून मुलाचे नाव ‘देवी भैरवी’च्या नावावरून ‘भैरव’ ठेवते...
आज या मुक्कामी तर उद्या त्या मुक्कामी... मेंढी चरायला घेऊन जाणा-या शिरपतीला त्याच्या कळपाची उदरभरण आणि कुटुंबाची काळजी सतत असायची. आपल्या कळपातील प्रत्येक मेंढी आणि शेरडावर जिवापाड प्रेम करणा-या शिरपतीप्रमाणे हसण्यात १०-१५ वर्षांचा झाला होता. शाळेत जात होता. शिरपतीनेही आता मु.पो. चिखलीत आपला तळ ठोकला होता.
भैरवचे बालपण फार मजेत गेले... रानावनात आणि निसर्ग सानिध्यानात मेंढ्याच्या प्रेमात त्याचे बालपण गेले होते... कळपात नव्यानेच जन्म घेललेल्या लक्ष्मीच्या शेरडीला दोन पिल्लाचा लाभ होतो... भैरव आणि त्याचा कुटुंबाला आनंदाचा पारावर नाही राहिला... फक्त काळी आणि फक्त पांढरी रंगाची दोन पिल्ल यांच्या बरोबर दिवस खुप छान मज्जेत घालवताना कधी शाळेला जायला कंटाळा करणारा ‘भैरव’आयचा मार देखील आनंदाने खायचा... मग शिरपतीच्या मध्यस्थीने भैरव ‘सई’च्या तावडीतून सुटायचा... पिल्ल आता जराशी मोठी झाली होती. दोन्ही पिल्लांना भैरवचा चांगलाच लळा होता. तो दिसला की ती उड्या मारायची... रानावनात फिरायचा... दोस्तांबरोबर खेळायचा पण त्याचा जीव त्या दोन पिल्लांवर खूप असायचा...
इकडे शिरपती आणि सईदेखील संसारात खूश होते... शिरपतीनेही दुष्काळात आपल्या मेंढ्याच्या कळपाच्या उपजिवेकेसाठी गावातल्या सावकाराकडून कर्ज घेतले होते... त्यामुळे उदरनिर्वाह आणि कर्जाची परतफेडीची चिंता शिरपतीला सतत असायची... पण सई त्याला सतत आधारही द्यायची... चिखलीच्या मुक्कामी असताना शिरपतीने एका पडक्या घराचा देखील आपल्या संसारासाठी उपयोग केला होता. भटक्या आणि विमुक्त जातीसाठी सरकारी सवलती आणि योजनांचा शिरपतीसारख्या पोटापाण्यासाठी भटकंती करणा-या लोकांना काहीच मागोसा नसतो... शिरपतीने कर्ज घेतलेल्या सावकाराच्या ‘महिपतराव’ला देखील मूलबाळ होत नसते. अशावेळी मागल्या ‘पीरबाबाच्या’ जत्रेमध्ये त्याच्या बायकोने ‘चांगुणानं’ केलेल्या नवसामुळेच आपल्याला पुत्रप्राप्ती झाली यामुळे सावकारही खूश असतो. पण यंदाच्या जत्रेत आपण नवस फेडायचा असा त्याचा घाट असतो. केलेल्या नवसाप्रमाणे चांगुणा पांढ-या रंगाचे कोकरू बळी देईन असे म्हणाली असते... यंदाची जत्रा तोंडावर आली असताना सावकाराला चांगुणा याची आठवण करून देते... सावकारही ह्या जत्रेत तो नवस फेडण्यासाठी अशा कोकरूच्या शोधात असतो. पण त्याला फारसे काहीच यश येत नाही. शेवटी कामावरच्या गड्याच्या सांगण्यावरून त्याला शिरपतीकडे अशाप्रकारचेकोकरू आहे असे कळले... जत्रा तोंडावर आली असताना चांगुणा देखील महिपतरावाकडे यासाठी मागे लागते.
सावकार शिरपतीची भेट घेऊन त्याच्याकडे असलेल्या कोकरांसाठी मागणी करतो. पण शिरपती बळी साठी तयार नसतो. तो म्हणतो, “माझ्या कळपातील सगळे कुटुंबासारखे आहेत. लेकराचा आणि बायकोचा जीव देखील अगदी पोराबाळाप्रमाणे आहे.” तुम्हाला पाळायला हवं असलं तर देतो... पण बळी नको... सावकार खिन्न होऊन परततो... इकडे शिरपती आणि सई चिंतीत होतात... चांगुणा हट्ट करते... नवस काही झाल्या फेडायला हवा... तुमी काय बी करा पण नवस पूर्ण करा... दुस-या दिवशी सावकार पुन्हा शिरपतीकडे कोकराची मागणी करतो. कर्ज फेड किंवा कोकरू दे... कर्ज फेडणे अशक्य असते... भैरवलाही या गोष्टीचा पता नसतो. तो त्या कोकराबरोबर खेळताना बाप त्याला पाहतो... सावकाराकडेदोन दिवसाची मुदत घेऊन शिरपती निवांत होतो... दोघा नवरा बायकोला झोप येत नाही ते दोघं शेवटी कोकरू भैरवला न सांगताच द्यायला राजी होतात.
सावकार दुस-या दिवशी जत्रा असल्यामुळे कोकराला घेऊन जातो... जाताना सावकार शिरपतीला काही पैसे देतो... भैरवला जत्रेच्या दिवशी कोकरू कुठेच दिसत नाही... सई आणि शिरपती म्हणतात इथेच कुठेतरी असेल... असे म्हणून समजावतात... पण भैरव त्या कोकराला शोधायला निघतो... वाटेत ‘संपत’ नावाचा त्याचा मैतर भेटतो... तो सांगतो, ‘महिपतरावानं’ तुझ्या बाबाकडून कोकराला विकत घेताना त्यानी बघितलयं... तू वाचीव त्याला... आज महिपती दुपारच्या पारी त्याला पीरबाबाला बळी देणार हाय... भैरव तसाच पळत घरी जातो... रडवेल्या भैरवला दोघेही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण भैरव ऐकण्याच्या परिस्थितीत नसतो. तो भांडून ते पैसे शिरपतीकडून काढून घेतो... आणि सावकाराला द्यायला पळत सुटतो... सावकारच्या घरी पोहोचतो तिथे त्याचा गडी सांगतो... महिपतराव बळी द्यायला टेकडीच्या पीरबाबाकडे गेलेत... म्हणून इकडे भैरव तडक धावत टेकडीच्या दिशेने जातो... भैरव धावतोय, हातात पैसे आहेत. महिपतराव आधीच टेकडीवर कोकराला बळी द्यायला सज्ज आहेत... त्याला पाणी पाजून देतात, सु-याला शेवटची धार होतेय... कोकराच्या गळ्यात माळा आहेत... भैरव धावत तिकडे पळतोय... गुलाल उधळला जातोय... आणि भैरव पोहोचणार इतक्यात सुरा कोकराच्या मानेवरून फिरतो... भैरवच्या हातातली पैशाची थैली पडते... भैरव स्तब्ध... थैलीतील काही नाणी घरंगळत पीरबाबाच्या दगडापर्यंत जातात... रक्ताचे चित्कारे त्या दगडावर देखील उडालेले असतात... भैरव तसाच रडत परत पळायला सुरुवात करतो... फक्त चढीच्या रस्त्यावर भैरव पळतोय... क्षितीज टेकलेल्या ठिकाणी भैरव हळुहळु दिसायला लागतो... रडवेल्या भैरवला त्या चढीच्या ठिकाणी दम लागतो, तो गुडघ्यावर हात ठेवून तसाच उभा राहतो... डोळ्यात कारुण्याचे भाव उमटले आहेत...



वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com