postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - पनीर बिर्याणी




नमस्कार 


 बिर्याणी स्पेशल रेसिपी मध्ये आज आपण बघुया पनीर बिर्याणी

साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
३-४ वेलची, ३-४ तमालपत्र, ३-४ लवंगा, १ लहान दालचिनीची तुकडा
चवीपुरते मिठ
★पनीर मॅरीनेशन
२५० ग्रॅम पनीर, १/२ कप दही, १ चमचा आलेलसूण पेस्ट, १/४ चमचा मिठ
★ग्रेव्ही
१ कप कांदा उभा पातळ चिरून
४-५ टोमॅटो, २ चमचे आलेलसूण पेस्ट, २ चमचे तूप
खडा गरम मसाला - २ वेलची, ३-४ लवंगा, ३-४ मिरीदाणे, २-३ तमालपत्र
२चमचे धने जिरं पूड
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा लाल तिखट
१ कप मिल्क पावडर किंवा १/२ कप क्रिम
चवीपुरते मिठ
साधारण पाऊण ते एक पेला भाज्यांचे तुकडे :- मटार, गाजर लहान तुकडे, फरसबी तुकडे
इतर साहित्य
४ चमचे तूप + अजून तूप ऐच्छिक
१ पेला कांद्याचे पातळ उभे काप
८ ते १० काजू
१/४ वाटी पुदीना बारीक चिरलेला
१/४ वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
२ चमचे दूध + ३ ते ४ केशराच्या काड्या

कृती:
★पनीर
दही फेटून घ्यावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि मिठ घालून मिक्स करावे. पनीरचे तुकडे या मिश्रणात १/२ तास घोळवून ठेवावे.
★भात
१) तांदूळ स्वच्छ धुवून १/२ तास निथळत ठेवावेत. एका पातेल्यात ६ कप पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात वेलची, लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि मिठ घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले कि त्यात धुतलेले तांदूळ घालावे. भात साधारण ६० ते ७० % शिजला कि चाळणीमध्ये ओतावा आणि अधिकचे पाणी काढून टाकावे. तयार भात परातीत मोकळा करून गार होण्यास ठेवावा.
★ग्रेव्ही:-
१) पाणी उकळवावे. त्यात टोमॅटो घालून २ मिनीटांनी गार पाण्यात सोडावे. सालं सुटली कि काढून टाकावी. आतील गराच्या मध्यम फोडी कराव्यात.
२) कढईत २ चमचे तूप गरम करून त्यात खडा गरम मसाला काही सेकंद परतावा. आलेलसूण पेस्ट परतावी. कांदा घालून तो गुलाबी रंग येईस्तोवर परतावा. नंतर चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालून त्या नरम होईस्तोवर परतावे आणि लाल तिखट घालावे.
३) हे मिश्रण थोडे गार होवू द्यावे. मिक्सरमध्ये पाणी न घालता प्युरी करावी.
४) कढईत साधारण २ चमचे तूप गरम करावे. यामध्ये काजू परतून बाजूला काढून ठेवावे. याच तुपात हि प्युरी परत घ्यावी. मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावी. त्यात धणेजिरेपूड, गरम मसाला घालावा. मिल्क पावडर किंवा फ्रेश क्रीम घालावे ,भाज्या घालाव्यात. निट ढवळून हे मिश्रण घट्टसर करावे. चवीपुरते मिठ घालावे. हि ग्रेव्ही एकदम पातळ किंवा एकदम घट्टही नसावी . ग्रेव्ही दाटसर होत आली कि पनीरचे मॅरीनेट केलेले तुकडे घालून थोडा वेळ उकळी काढावी.
◆तळलेला कांदा
तुपात किंवा तेलात कांद्याचे पातळ काप (१ वाटी) खरपूस तळून काढावेत. हा तळलेला कांदा सजावटीसाठी वापरावा.
◆बिर्याणी
एकदा भात आणि ग्रेव्ही तयार झाली कि भाताचे ४ आणि ग्रेव्हीचे ३ असे समसमान भाग करून घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात पहिले तूप सोडावे आणि पसरवून घ्यावे. प्रथम भाताचा एक भाग घेऊन समान पसरावा. त्यावर ग्रेव्हीचा १ भाग समान पसरवून घ्यावा. थोडा चिरलेला पुदीना आणि कोथिंबीर घालावी. ३-४ काजू घालावे. अशाप्रकारे सर्व थर पूर्ण करावे. भाताचा शेवटचा थर दिला कि त्यावर तळलेला कांदा, उरलेले काजू दूधात कालवलेले केशर असे पसरावे. वरती घट्ट झाकण ठेवावे, वाफ बाहेर जाता कामा नये. एकदम मंद आचेवर १५ ते २० मिनीटे वाफ काढावी. गरम गरम बिर्याणी रायत्याबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
१) ग्रेव्ही पातळ नसावी. पातळ ग्रेव्हीमुळे बिर्याणी बनवताना भाताची शिते मोडतात आणि भात मोकळा न होता ओलसर आणि गच्च होतो. बिर्याणीचे थर करताना पसरता येईल इतपत दाट ठेवावी.
२) जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून वरीलप्रमाणेच थर करावे. आणि डायरेक्ट गॅसवर न ठेवता खाली एक तवा ठेवावा त्यावर भांडे ठेवावे म्हणजे भात करपणार नाही.
३) प्रत्येक थरामध्ये पातळ केलेले तूप गरजेनुसार घालावे. यामुळे बिर्याणीला खुपच छान चव येते.
४) शक्यतो मिल्क पावडर वापरावी म्हणजे ग्रेव्हीला दाटपणा लगेच येतो. तसेच क्रिम वापरणार असाल तर क्रिम घातल्यावर ते ग्रेव्हीमध्ये निट मिक्स होईस्तोवर ढवळा म्हणजे ते ग्रेव्ही फुटणार नाही.
५) जर केशर नसेल तर चिमूटभर खायचा केशरी रंग २ चमचे दूधात घालून तो वापरावा.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment